सामाजिक कामाचा व्यापक दृष्टीकोन...
१९७३ सालच्या हिवाळ्यात चिखली बँकेच्या कार्यक्रमासाठी डॉक्टर अविनाश आचार्य बुलढाणा जिल्ह्यातील चिखली गावी गेले होते. बँकेने पैसे देण्याघेण्याबरोबरच जे सामजिक काम सुरु केले होते त्यामुळे कार्यक्रमानंतर डॉ.आचार्य जळगावला परतले ते, असे काही जळगावला उभे करायचे हे मनात ठरवूनच. जळगावला आल्या आल्या आपल्या सहकाऱ्यांना बोलावून त्यांनी आपल्या मनातली एका बँकेची कल्पना सांगितली जी बँक सावकारी न करता समाजाच्या गरजा आणि प्रश्न सोडविण्याचे काम करेल. कल्पनेची व्याप्ती मोठी होती. माणसे, साधन-सामग्रीची जुळवाजुळव करताना काही काळ गेला आणि देशात आणीबाणी लागू झाली. संघाचे जिल्हा संघचालक असलेले डॉक्टर आचार्य १९ महिने कारागृहात बंदिस्त झाले.. कारागृहाच्या कोठडीत व्यक्ती बंदिस्त होती,विचार मात्र अधिक तेजाळून बाहेर आले होते. कारागृहातून बाहेर आल्यावर विस्कटलेली सर्व घडी नीट करण्यात काही वेळ गेला आणि २० जानेवारी १९७९ साली जन्म झाला जळगाव जनता सहकारी बँकेचा…
भाड्याने घेतलेल्या जागेत १ अधिकारी, १ रोखपाल, २ लिपिक आणि २ शिपायाच्या माध्यमातून सुरु झालेल्या बँकेच्या कामाचा आज वटवृक्ष झाला आहे. ९ जिल्हे, ४० शाखा,३८४ कर्मचारी आणि ३ हजार कोटीचा व्यवसाय. त्याच्या जोडीला शून्य NPA असलेल्या ६० हजार महिलांचा सहभाग असणाऱ्या ३५०० पेक्षा जास्त बचत गटाचे उत्तर महाराष्ट्र्तातील जाळे…असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी …..खान्देशातील सामजिक,शैक्षणिक, आर्थिक व वैद्यकीय क्षेत्रांत काम करणाऱ्या केशवस्मृती समूहाच्या उभारणीची ही रूजवात होती…
आपल्या सकारात्मक प्रतिसादाच्या प्रतीक्षेत,
केशवस्मृती प्रतिष्ठान