घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे!
थॅलेसेमिया हा आजार जन्मतःच अनुवांशिक असून या आजारात रुग्णांच्या शरीरात रक्त तयार होत नाही. म्हणून अशा रुग्णांना नियमित बाहेरून रक्त द्यावे लागते. असाच एक थॅंलेसीमियाग्रस्त श्री हा पहिल्यांदा रक्त केंद्रात आला तेव्हा तो दोन वर्षांचा होता. श्रीची आई त्याला कडेवर घेऊन रक्त केंद्रात येत असे. रक्तबॅग तयार होईपर्यंत श्रीला मांडीवर घेऊन बसलेली असायची. तेव्हा श्रीला महिन्यातून दोन वेळेस रक्त द्यावे लागायचे. श्री थॅलेसिमियाग्रस्त असल्याने माधवराव गोळवलकर रक्तकेंद्रातून विनामूल्य रक्तबॅग घेऊन जात असे. “ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती असू द्यावे समाधान” या उक्तीप्रमाणे आहे त्या परिस्थितीशी दोन हात करून काळक्रमिका होऊन श्री लहानाचा मोठा होऊ लागला. तो हिंडू फिरू लागला, शाळेत जाऊन त्याने शिक्षण घेतले. हाच श्री आता २४-२५ वर्षांचा होऊन स्वतः चरितार्थ चालवण्यासाठी कामधंदा करून स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करू लागला आहे. श्री रक्तकेंद्रात स्वतः येऊन स्वतः रक्ताची बॅग घेऊन जातो. श्रीला स्वतः रक्तदान करता येत नाही.
….घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे !
कुठलेही रक्त न देता सहजतेने रक्त केंद्रात रक्त मिळावे अशी प्रत्येकाची भावना असते. परंतु श्रीने चांगला मित्र परिवार जमवला.त्यांना रक्तदान करण्यास प्रोत्साहन देऊन रक्त केंद्रात घेऊन येतो. यामागे त्याची समाजाबद्दल असलेली तळमळ भावना व त्याच्यासारख्याच थॅलेसिमियाग्रस्त बालकांसाठी असलेली सहानुभूती व्यक्त होते. थॅलेसिमियाग्रस्त आजार असणाऱ्या बालकांना उदंड आयुष्य मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
आपल्या सकारात्मक प्रतिसादाच्या प्रतीक्षेत,
केशवस्मृती प्रतिष्ठान