चला त्यांचे मरण लांबवूया.....
नुकतेच रक्तपेढीत येऊन बसलेल्या व्यवस्थापकांना, भेटायला तीन जण आले आहेत असा निरोप मिळाला. सकाळच्या वेळी कोणालातरी अर्जंट रक्ताची गरज असेल असे वाटून हातातली कामे आटपून त्यांनी तिघांनाही भेटायला बोलाविले. एका जन ओळखीचे वाटत होते. समोर बसताच क्षणी ते स्पुंदून रडायला लागले. व्यवस्थापकाला कळेना काय झाले. अहो आमची मुलगी मागच्या आठवड्यात सोडून गेली. असे म्हणत त्यांनी तिथेच कार्यालयात टाहो फोडला.मुलीने एल.एल.बी.ची शेवटच्या वर्षाची परीक्षा दिली होती. खूप हुशार होती,आता वकील झाली असती. कधीतरी ती जाईल हे त्यांना माहित होते.पण पोटची पोर अशी वयात येऊन निघून गेल्याचे दु:ख ते पचवू शकत नव्हते.
मुलगी रुग्ण होती. रक्तपेढीत महिन्यातून एकदा रक्त घ्यायला यायची. या आजारावर बोनमॅरो ट्रान्सप्लांट या अतिशय महागड्या व यशस्वी होण्याची कमी शक्यता असणाऱ्या उपचाराव्यतिरिक्त कोणताही उपचार करता येत नाही. रक्त पेढीतून या रुग्णांना मोफत रक्त दिले जाते. मात्र या घटनेकडे अधिक गांभीर्याने बघत नियमित रक्त घेणाऱ्या थैलेसमिया रुग्णांना प्रत्येकी १० रक्तदाते जोडून देण्यात आले. देवकी व वासुदेव जन्मदाते असले तरी भगवान कृष्णांचे पालन यशोदा व नंदराजाने केले. त्याचप्रमाणे या थॅलेसेमिया ग्रस्त रुग्णाच्या पालकत्वाची जबाबदारी या रक्तदात्यांनी घेतली. कृष्ण जन्माष्टमीनिमित्त थैलेसिमिया पालक रक्तदाता या योजनेचा शुभारंभ झाला.
या आजाराने ग्रस्त असलेल्यांचा अकाली मृत्यू लांबविण्यासाठी आणि शक्य असल्यास थांबविण्यासाठी केशवस्मृतीने पुढाकार घेऊन थैलेसिमिया मुक्त समाज हा प्रकल्प राबविण्याची सुरवात केली. असहायपणे मृत्युच्या प्रवासाला निघालेल्या आपल्या जिवंत मुलांना पाहतांना तीळतीळ तुटणारे आईबाप किमान आता बघायला मिळणार नाहीत. आम्ही नेहमी कटिबध्द राहू.. त्या मुलाच्या आनंदी जीवनाची ज्योत तेवत राहण्यासाठी.
आपल्या सकारात्मक प्रतिसादाच्या प्रतीक्षेत,
केशवस्मृती प्रतिष्ठान