चलो जलाएँ दीप वहाँ,
जहाँ अभी भी अंधेरा है.
केशवस्मृती नावाच्या संस्थेची शासन दफ्तरी नोंदणी होण्यास ९ मे ला ३२ वर्ष पूर्ण होत आहेत. सेवेच्या या वर्षांच्या प्रवासात अनेक चढ-उतार संस्थेने पहिले. परिस्थितीचे, मानवी संबधांचे, आर्थिक अडचणीचे. सेवेच्या लावलेल्या पणतीचा प्रकाश मात्र आता मोठा झाला आहे. अंधारलेल्या वाटाना या प्रकाशाचा उजेड मिळावा म्हणून हा दिवा आता अधिक प्रज्वलित होत आहे.
हे वर्ष अजून एका मैलाच्या दगडाचे. माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तकेंद्र, मांगीलालाजी बाफना नेत्रपेढी व चिकित्सालय आणि जेष्ठांसाठीच्या मातोश्री आनंदाश्रम या प्रकल्पांचे हे रौप्य महोत्सवी वर्ष १९९८-९९ या वर्षात सुरु झालेले हे प्रकल्प आता पंचविशीत आले आहेत. मानवी जीवनातील काही नैसर्गिक तर काही परस्पर संबंधांमुळे तयार झालेल्या गरजांवर या प्रकल्पांच्या माध्यमातून उत्तरे काढण्याचा प्रयत्न झाला आणि आजमितीस या प्रकल्पांच्या लाभार्थ्यांची संख्या ३ लाखांपेक्षा जास्त झाली. घेणेकरी वाढले तसे देणेकरीही वाढले. काहीतरी चांगले काम करावे या मनातील इच्छेला वाव मिळण्याची जागा देखील या प्रकल्पांच्या माध्यमातून अनेकांना मिळाली. विविध क्षेत्रांत आपल्या कर्तुत्वाची ध्वजा उंचावणारे सेवेकरी म्हणून या प्रवाहात सामील झाले आणि सेवेच्या या पालखीचे भोई म्हणून चालू लागले आहेत.
सेवेच्या या प्रवासात केवळ नेकी कर कुएँ में डाल… अशी भूमिका न घेता काही चांगले बदलाचे, परिवर्तन करण्याचा प्रयत्न यात सदोदित राहिला. याकामाने उत्पन्न झालेल्या मानवी आयुष्यातील बदलाच्या यशदायी कहाण्यांचा आपणा सर्वांबरोबर संवाद व्हावा म्हणून सुरु झालेल्या या सेवा संवादाची देखील आज वर्षपूर्ती. आपणा सर्वांनाच या प्रवाहात सहप्रवासी होता आले याचा ही आंनद आहे. संघ गीतातील ओळी प्रमाणे आपणही एक स्वरात म्हणूया चलो जलाएँ दीप वहाँ, जहाँ अभी भी अंधेरा है…
आपल्या सकारात्मक प्रतिसादाच्या प्रतीक्षेत,
केशवस्मृती प्रतिष्ठान