त्याला आयुष्य जगण्याची उमेद मिळाली....
शेतात काम करताना डाव्या डोळ्याला कणसाचा फटका लागून दृष्टी गेली आणि आता एकाच डोळ्याने आयुष्य चालवायचे असे त्याने मन बनवले. गुराढोरांच्या, शेतीच्या कामापासून ते गाडी चालवण्यापर्यंत एका डोळ्याने काम करताना न दिसणाऱ्या डोळ्याच्या वेदना मात्र त्याला रात्री पेन किलर घेतल्या शिवाय झोपू देत नव्हत्या. घरातला कर्ता पुरुष असल्याने हे कोणाला सांगणार. सुरवातीला डॉक्टरांच्या प्रयत्नांनी डोळे येतील अशा आशेने नाशिक,नवसारी,जालना,पुणे,मुंबई सर्व ठिकाणाचे उपचार झाले.पण एका डोळ्याच्या अंधात्वासोबत जगण्यचे आता त्याच्या कुटुंबासोबत त्यानेही स्वीकारले. काही वर्षांनी दुसऱ्या डोळ्यावर जेव्हा ताण येऊ लागला तेव्हा मात्र तो आतून खचला, मानसिक निराशेत गेला.
कोणीतरी केशवस्मृतीच्या नेत्रपेढी बद्दल सांगितले. थोड्या अविश्वासानेच त्याने नेत्रपेढीत डोळे तपासले .डॉक्टरांनी तपासणी नंतर नवीन डोळा बसविल्यास दृष्टी मिळू शकेल असे सांगितले. मनात शंका आली पैसे किती लागतील. एकही पैसा लागणार नाही हे व्यवस्थापकाने दोनदा सांगूनही त्याला खरे वाटत नव्हते. ऑपरेशन झाले.चार दिवसांनी डोळ्यावरची पट्टी काढण्यची सुरवात झाली आणि अधिरतेने त्याचे मन डोळ्यात एकवटू लागले..डोळ्यावरची पट्टी पूर्ण काढून झाली..आणि डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रुना वाट देत.. अंधुकशा ..पुसटशा दृश्यातून हळू हळू स्पष्ट दिसायला लागले.
आता दोन्ही डोळ्यांनी पूर्वीसारखेच आयुष्य झाले. केवळ कमी पैशात डोळ्यांची तपासणीच नव्हे तर आयुष्याची नवी उमेद देण्याचे काम मांगीलालाजी बाफना नेत्रपेढीच्या माध्यमातून अविरतपणे मागील २४ वर्ष सुरु आहे.
आपल्या सकारात्मक प्रतिसादाच्या प्रतीक्षेत,
केशवस्मृती प्रतिष्ठान